दहावी बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाने दिले स्पष्टीकरण…
राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ शकुंतला काळे यांनी दिली माहिती…
- मुंबई / वृत्तसंस्था
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. सर्वसाधारणपणे हे निकाल दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरूवातीला लागणारा दहावी-बारावीचे निकाल यंदा लॉकडाउनमध्ये अडकला आहे. गेल्या आठवडाभरापासून दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात प्रसारमाध्यमांत आणि सोशल मीडियावर निकालासंदर्भात बातम्या प्रकाशित होत आहेत. त्यासंदर्भात राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
राज्यातील दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन आणि निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. अद्याप निकालाची तारीख ठरलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी निकालाच्या कोणत्याही तारखांवर विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी लोकसत्ताला दिली आहे.
करोना विषाणू संसर्गामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा दहावी – बारावीचा निकाल जाहीर करता आलेला नाही. करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा निकाल जाहीर होण्यास थोडा उशीर होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांत दहावी – बारावीच्या निकालाच्या तारखांची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी निकालाची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे स्पष्ट केले.
यंदा सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची तर सुमारे १७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. गेल्यावर्षी राज्य मंडळाचा दहावीचा निकाल ८ जून तर बारावीचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता.