राज ठाकरे दंगली भडकवण्याच्या प्रयत्नात; अमोल मिटकरी यांचा आरोप
- क्राईम टाईम्स डिजिटल टीम
अकोला :- मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. भोंगे वाजविल्यामुळं लोकांना त्रास होतो. त्यांनी दगडफेक केली तर आमचे हात काही बांधलेले नाहीत, असा थेट इशारा दिला. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना चांगलेच धारेवर धरत त्यांच्यावर मोठा आरोप केला. राज ठाकरे हे दंगली भडविण्याचे काम करीत आहेत. समान नागरिक कायदा (The same civil law) अपेक्षित होता. हा कायदा नेमका कशासाठी आहे, हे तरी त्यांनी वाचून घ्यावे. प्रसिद्धीसाठी पोकळ घोषणा करता. यातून हाती काहीच लागणार नाही. तुम्ही संभाजीनगरला जा, अयोध्येला जा, श्रीरामाचे दर्शन घेताना आत्मीयेतेने दर्शन घ्या. चेहऱ्यावर सात्त्विक भाव येऊ द्या. हनुमान चालिसाच्या दोन ओळी तुम्हाला म्हणता येत नाही, अशी खोचक टीका अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंवर केली.
ते म्हणाले, दोन वर्षांपासून राज्यावर आर्थिक संकट आहे. आता कुठे राज्य आर्थिक संकटातून बाहेर पडत आहे. सर्वसामान्य हिंदू असेल, सर्वसामान्य मुस्लिम असेल, त्यांचे रोजंदारीचे उदरनिर्वाहाचे प्रश्न आहेत. भोंगे वाटणे, हातात तलवारी घेणे, तलवारी वाटणे हे आमचे प्रश्न नाहीत. राज्याला फुले, शाहू आंबेडकर यांची परंपरा आहे. देशाला बाबासाहेब यांनी संविधान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निकाल वाचून काही लोकांना वाटत असेल तर मशिदीवरील भोंगे उतरवा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल परत एकदा वाचावा. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कोणत्याही धार्मिक स्थळावर भोंगे वाजता कामा नये, असा निकाल आहे.
त्यांनी तलवारी काढल्या तर आम्ही तलवारी काढू, अशा प्रकारच्या वल्गना करायच्या. काल महाराष्ट्राने तुमचे मनसुबे उधळले आहे. अनेक ठिकाणी मुस्लिमांनी हनुमान चालिसा वाचला. कायद्याचे राज्य आहे. कायद्याने राज्य चालते. हिंदू, मुस्लिम यांना शिक्षणाचे, बेरोजगारीचे, दरवाढीचे प्रश्न महत्त्वाचे आहे. दंगली भडकल्या, तर गृह विभागाने लक्ष दिले पाहिजे आणि चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली.