औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; खासदार जलील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारनं तत्काळ औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. याबाबत जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर परतीच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे आतोनात आर्थिक नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसान भरपाई देण्याची मागणीही जलील यांनी केली आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून म्हटलं आहे की, औरंगाबाद जिल्ह्यात ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर परतीच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळं नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे आतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागात शेतकरी बांधवांचे खरिप हंगामाचे उभे पिक वाहून गेल्याने आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडल्याची प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचं जलील म्हणाले.
जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत. जेणेकरुन नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत लवकरात लवकरत मिळण्यास मदत होईल. म्हणून आपणास नम्र विनंती की, शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन आर्थिक मदत जाहीर करावी, असे जलील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे