अब्दुलभाई आणि संदीपान भय्यांना भेटण्याची मला उत्सुकता आहे- सुषमा अंधारे-औरंगाबाद
औरंगाबाद :- शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची महाप्रबोधन यात्रा सध्या औरंगाबाद येथे दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान ठिकठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत. यातून ते वारंवार शिंदे गटावर टीकाही करत आहेत; परंतु आज तर त्यांची यात्रा शिंदे गटातील नेते व कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या जिल्ह्यात पोहचली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सभेतून अब्दुल सत्तार यांचा समाचार घेणार का? असा प्रश्न विचारला असता, यावर सुषमा अंधारे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, मी औरंगाबादला आल्यामुळे अब्दुलभाई आणि संदीपान भय्यांना भेटण्याची मला उत्सुकता आहे. खूप दिवसांनी भावा-बहिणीत गुजगोष्टी होणार, कुटुंबातले वाद आहेत. बोलत राहू, असे सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या आहेत.
दरम्यान, अब्दुल सत्तार हे सिल्लोड येथील तर संदीपान भुमरे हे पैठण येथील आमदार आहेत. औरंगाबादमधील शिंदे गटातील ते महत्त्वाचे नेते आहेत. कृषिमंत्रिपद मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या काही वक्तव्याने राजकीय वर्तुळात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अब्दुल सत्तार हे चांगलेच वादात सापडले होते. यावरून सुषमा अंधारे यांनी सत्तार तसेच जळगावातील गुलाबराव पाटील यांच्याविरोधात तीव्र टीकाही केली होती; परंतु आता औरंगाबादमध्ये सत्तार विरुद्ध सुषमा अंधारे हा सामना कसा रंगणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यावरूनच सत्तार आणि भुमरे तुमचे स्वागत करतील की नाही? असा प्रश्न विचारल्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, हे दोघेही माझे स्वागत करतील; परंतु त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल. २०२३ मध्ये मध्यावधी निवडणुका लागणार आहेत, हे मी आधीच सांगितलेय. तोपर्यंत बऱ्याच गोष्टी घडतील, असे त्या म्हणाल्या. तसेच, राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या हा सर्वस्वी मनसे आणि काँग्रेसचा प्रश्न आहे. आमचे मत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यामुळे मी या वादात बोलणार नाही, असे बोलून त्यांनी यावर भाष्य करणे टाळले