शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच;रोखण्यासाठी मराठवाड्यातील 15 लाख शेतकरी कुटुंबांचा होणार सर्व्हे
अतिवृष्टीपासून सुरू झालेले मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. हे रोखण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक, सुरक्षितता आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या शासकीय योजना यांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यासाठी ग्रामसेवक अंगणवाडी सेविका, कृषी सहायक तसेच शिक्षकांच्या माध्यमातून ५२ लाख सातबारा असलेल्या १५ लाखपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.
तीन महिन्यांत याचा अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नाव, गाव, शैक्षणिक पार्श्वभूमी, मुख्य व्यवसाय असलेली शेती, जोडधंदे, मजुरी, सरकारी अथवा खाजगी नोकरी असे पूरक उत्पन्नाची साधने, त्याच्या सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा याची माहिती घेतली जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्या योजनांचा फायदा मिळाला आहे, त्याच्या गरजा काय आहेत, योजनांचा त्यांना लाभ मिळाल्यास काय फायदा होऊ शकतो या माहितीचा ८ पानांचा फॉर्म तयार केला आहे.
मराठवाड्यात शेतकऱ्यांंची आर्थिक सामाजिक कौटुंबिक सुरक्षेची पाहणीनंतर त्यांना योजनांचा लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न आहे. आगामी तीन महिन्यात याबाबतची माहिती गोळा केली जाणार असून त्यांनतर त्याचे विश्लेषण करून शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे -पराग सोमण, महसूल उपायुक्त
औरंगाबाद: आधी पत्नीचे केस कापले, नंतर मुलासमोरच मारहाण करत तिला संपवले!