मोदी सरकारचा मोठा निर्णय, रेशन दुकानांमध्ये ५ किलो गहू-तांदुळ मोफत मिळणार
- क्राईम टाईम्स टीम
मुंबई :- कृषी क्षेत्राच्या दृष्टीने मोदी सरकारने (Modi Government) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा धडाका सुरुच केला आहे. बुधवारी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर आता रेशन दुकानातून मोफत मिळणाऱ्या गहू-तांदळाबद्दल मोठा निर्णय घेतला गेला आहे. आणखी चार महिने नागरिकांना गहू आणि तांदुळ हे मोफतच दिले जाणार आहे. मार्च २०२२ पर्यंत आहे त्याच दरात ह्या अत्यावश्यक वस्तू मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक घेण्यात आली. यानंतर ही घोषणा करण्यात आली.
कृषी सुधारणा कायदे मागे घेतल्यानंतर लागलीच धान्यांच्या दराबाबत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रेशनवरील धान्य हे विकत देण्याच्या तयारीत सरकार होते मात्र, आज केंद्रीय कॅबिनेटची बैठकीत वेगळाच निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पहिला निर्णय रेशनच्या धान्यबद्दल घेण्यात आला. मध्यंतरी कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना पाच किलो गहू-तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली होती. ही योजना गेल्या १५ महिन्यांपासून सुरू आहे. आता केंद्र सरकारने या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च २०२२ पर्यंत गरिबांना मोफत गहू-तांदूळ मिळणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे गरीबांना मोठा दिलासा मिळणार आहे.