कोरोनाचा ‘महाराष्ट्र’वर प्रेम!; आणखी काही धक्क्यांसाठी सज्ज व्हा; एमआयएमकडून खिल्ली
- क्राईम टाईम्स टीम
औरंगाबाद : देशासह महाराष्ट्रात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. संसर्गाचा वेग कितीही वाढत असला तरी लाॅकडाऊन नकोच, अशी भूमिका सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि सरकारने घेतली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यात काही प्रमाणात निर्बंध लागू केले असून, आज मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
दोन दिवसांपुर्वीच कुठलेही निर्बंध घाला मात्र लाॅकडाऊन सहन करणार नाही, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी घेतली होती. परंतु रात्रीची संचारबंदी लावण्याच्या निर्णयाची मात्र त्यांनी खिल्ली उडवली आहे.
`कोरोनाची स्थिती बघता नुकतीच सर्व उच्च नोकरशहांसोबत सविस्तर बैठक झाली आणि विषाणूने सरकारला स्पष्टपणे सांगितले की तो रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत खूप सक्रिय असतील. या धमकीला उत्तर देताना सरकारने तात्काळ महाराष्ट्रात रात्रीचा कर्फ्यू जाहीर केला. ज्या दिवशी निवडणूक आयोगाने ५ राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले त्या दिवशी महाराष्ट्र पुन्हा सर्व काही बंद करण्याच्या जवळ आला आहे. यापेक्षा मूर्खपणाची गोष्ट काय असू शकते. हा विषाणू राज्य-विशिष्ट आहे आणि त्याला फक्त महाराष्ट्रात फिरायला आवडते. आणखी काही धक्क्यांसाठी सज्ज व्हा, असा चिमटा देखील त्यांनी ट्विटच्या माध्यमातून काढला.