भीषण अपघात: कायगावजवळ दोन कारचा भीषण अपघात, चार जण जागीच ठार
अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील कायगावजवळील गोदावरी शाळेच्या समोर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पहिली कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या कारला जाऊन धडकल्याने अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात मृत्यू झालेले चौघेही औरंगाबादच्या वाळूज भागातील बजाजनगर येथील व्यावसायिक होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारच्या (क्रमांक एम.एच.20 सी. एस. 5982 ) चालकाला कायगाव जवळ वळणाचा अंदाज न आल्याने त्यांची भरधाव कार दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेने गेली. दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या वॅग्नर कारला (एम.एच.27 बी. झेड. 3889) जाऊन स्विफ्ट कार धडकली. ज्यात स्विफ्टमध्ये असलेले चौघेजण गंभीर जखमी झाले होते. तर घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त कारचे दरवाजे तोडून जखमींना बाहेर काढत, गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमी झालेल्या चौघांनाही डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृतांमध्ये रावसाहेब मोटे (वय 56), सुधीर पाटील (वय 45), रतन बेडवाल (वय 38), भवसिंग गिरासे ( वय 38) ( सर्व रा. वाळूज महानगर) समावेश आहे. तर मृत चौघेही मित्र असून प्लॉटिंगचा व्यवसाय करीत होते. तर चौघेही एका व्यवहारासंदर्भात नगरला गेले होते. दरम्यान परतताना प्रवरासंगम येथे जेवण करून बजाज नगर येथे घरी जात असताना अपघात झाला.