लॉकडाऊन अफवा!; पांढऱ्या सोन्याचा भाव पडला; खर्चही निघेना, शेतकरी अडचणीत
- दिपक सिरसाट
अंधारी यंदा सततच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादन कमालीची घट झाली आहे. त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे दरही घसरू लागले आहेत. कापसाचा भाव गेल्या महिनाभरापासून ८ ते ९ हजारांच्या दरम्यानच स्थिरावलेला आहे. उत्पन्न खर्चही मिळणे मुश्कील झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कापसाचा हंगाम आता संपत आलाय,मात्र भाव काही वाढण्याचे नाव घेत नाही. कापसाला किमान साडेबारा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र सध्या केवळ सात ते साडेसात हजार रुपये एवढा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीला ब्रेक लावला आहे.
गेल्यावर्षी १२ हजार रुपयांवर पोहोचलेला कापसाचा भाव यावर्षी सुरुवातीपासूनच ९ हजारांच्या उंबरठ्यावर थांबलेला आहे. कापसाच्या भावात मंदी असल्याचे चित्र जिल्ह्याच्या बाजारपेठेत दिसून येत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे, असे असतानाही कापसाचा भाव मात्र गेल्या महिनाभरापासून ८ ते ९ हजारांच्या दरम्यानच स्थिरावलेला आहे.
खासगी व्यापाऱ्यांनी दिवाळीनंतर कापूस खरेदी सुरू केली. ९ हजार रुपयांवर भाव जाहीर केला. मात्र, बाजारपेठेत अजूनही चित्र उदासीन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या प्रतीक्षेत कापूस थांबवून ठेवला आहे.
शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा असताना लाल्या आणि बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकरी संकटात सापडला.या सर्व संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना खर्चही वाढवावा लागला. संकटावर मात करून शेतकऱ्यांनी पांढरे सोने पिकवले खरे मात्र मातीमोल भावाने मागणी होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
शेतकऱ्याच्या घरातून कापूस व्यापाऱ्यांकडे गेला की भाव वाढतात असा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याने शेतकऱ्यांनी आता विक्रीला ब्रेक लावला असून घराघरात कापूस साठवून ठेवण्यात येत आहे. सध्याच्या बाजारभावात कापूस विकला तर उत्पादन खर्चही निघणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे