शेतकऱ्याला मिळाला दोन रुपयांचा चेक; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संतापले
नगर :- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. सोलापूरमध्ये एका शेतकऱ्याला ५१२ किलो कांदा विकल्यावर १ रुपयाप्रमाणं दर मिळाला होता. त्यापैकी मोटारभाडे, हमाली, तोलाई याचे ५०९ रुपये वजा होऊन संबंधित शेतकऱ्याला केवळ २ रुपयांचा चेक मिळाला होता.
यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दानवे यांनी याप्रकारावरून केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते नगरमध्ये बोलत होते. बार्शी येथील शेतकऱ्याला कांदा विकल्यानंतर केवळ न दोन रुपयांचा चेक मिळाला. शेतकऱ्याची ही बिकट स्थिती सरकार उघड्या डोळ्याने बघत आहे. पण भूमिका घेत नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत केंद्र व राज्य सरकार नुसत्या खोटारड्या घोषणा करीत त्यांना रडवत आहे,असा घणाघात दानवे यांनी केला.
‘कांदा, कापूस, संत्री असेल यासर्व ठिकाणी सरकारचे धोरण परस्पर विरोधी आहे. सरकारच्या या धोरणांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडे कांद्याची निर्यात करण्याची मागणी केल्यानंतर सरकार कांद्याची निर्यात करीत नाही. तर, दुसरीकडे कापूस आयात करणे बंद करा म्हंटले तरीही सरकार कापूस आयात करते. सरकारचे हे धोरण परस्पर विरोधी असल्याचा घणाघात दानवे यांनी केला.
दरम्यान दानवे यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला. गेल्या वर्षी जुन्नर येथील एका शेतकऱ्याने कांदाला भाव मिळत नाही म्हणून पंतप्रधानाच्या वाढदिवशी पत्र लिहून आत्महत्या केली. पण त्यानंतरही सरकारला जाग आली नाही, दानवे म्हणाले.