मुख्यमंत्री शिंदें यांची घोषणा; कांद्याला ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देणार
राज्यातील कांदा उत्पादकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह 300 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली.
यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाजारात खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत देता येत नाही. कांदा हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे.
देशांतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर होतो. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने २०० आणि ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रतिक्विंटल ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.