खूप झाल्या घोषणा!! “शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्या आम आदमी पक्षाची मागणी”
“आप चे युवा जिल्हाअध्यक्ष सतीश लोखंडे शेतकऱ्यांसाठी आक्रमक”
- क्राईम टाईम्स टीम
सन 2022 आणि मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळी आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अद्यापही तालुक्यातील शेतकरी हा अनुदानापासून आणि नुकसान भरपाई पासून वंचित असल्याने आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम यांच्या मार्गर्शनाखाली युवा जिल्हाध्यक्ष सतीश लोखंडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना नुकसान भरपाई आणि अनुदान देण्यासाठी निवेदन देण्यात आले.
तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या दोन ठिकाणी किंवा इतर गावात असल्याने आधार कार्ड व इतर बाबी अपलोड करून केवळ एकाच शिवारातील आधार कार्डची एकाच वेळी नोंद होत आहे. दुसऱ्या ठिकाणी असलेल्या व शेतीचे नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष उमटत आहे. तसेच याप्रकरणी लवकरात लवकर लक्ष घालून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या अनुदानापासून आणि नुकसान भरपाई पासून वंचित ठेवण्यात येऊ नये नसता आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सतीश लोखंडे यांनी दिला आहे.
यावेळी संजय गुमलाडू, पुनमचंद महेर, भागचंद गुमलाडू, अनिल आव्हाड, सुनील जोनवाल,त्रिंबक गुमलाडू यांच्यासह शेतकरी आणि आम आदमी पक्षाचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
“शासनाच्या सदोषप्रणालीमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित”
शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रणाली ही सदोष असून केवळ एकाच आधार कार्डवर एकाच शेतीची नुकसान भरपाई व अनुदान देण्यात येत आहे. एकच शेतकऱ्याच्या दुसऱ्या गावी असलेल्या शेतीची नोंद होत नसल्याने शेतकरी वर्गाचे यामुळे जाणीवपूर्वक नुकसान करण्याचे काम शासन करत आहे. तरी याप्रकरणी लक्ष घालून शेतकऱ्यांना त्वरित अनुदान द्यावे नसता आम आदमी पार्टी शेतकऱ्यांसाठी तीव्र आंदोलन छेडल याची नोंद घ्यावी.
सतीश देवेंद्र लोखंडे, वेरूळकर
युवाजिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी औरंगाबाद
“पावसाळा आला तरी नुकसान भरपाई मिळेना”
मागील वर्षी अतिवृष्टीने माझे मोठे नुकसान झाले असून माझी वेरूळ आणि सहजपूर शिवारात शेती आहे. मात्र यंदा पावसाळा आला तरी मागील वर्षाचे नुकसान भरपाई आणि अतिवृष्टीची मदत अजूनही मिळालेली नाही. सद्यस्थितीत मी कर्जाच्या खाईत आहे. तरी शासनाने याप्रकरणी त्वरित दखल घेऊन मला नुकसान भरपाई व अनुदान द्यावे
शेतकरी त्रिंबक गुमलाडू,तलाववाडी वेरूळ
“तलाठी यांना तीनदा कागदपत्रे देऊनही अनुदान मिळेना”
माझी तलाववाडी शिवारात शेती असून तलाठी यांना तीन वेळेस आधार कार्ड, सातबारा, बँक पासबुक व इतर कागदपत्रे देऊनही अनुदान व नुकसान भरपाई मिळत नाही. पंचनामे होऊन वर्ष उलटले आहे. तरी शासनाने दखल घेऊन मदत करावी.
पूनमचंद महेर, शेतकरी