औरंगाबादेत आढावा: प्रत्येक तालुक्याचा आपत्कालीन आराखडा तयार करा : कृषिमंत्री धनंजय मुंडे
मराठवाड्यातील बहुतांश भागाला दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी एकटे आहोत असे समजू नये. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. दुष्काळाची संभाव्य दाहकता पाहता जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुकानिहाय आपत्कालीन आराखडा तयार करून शासनाला सादर करावा, असे आदेश देण्यात आले असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
औरंगाबाद येथे मराठवाड्यातील संभाव्य दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन शुक्रवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर मुंडे पत्रकारांशी बोलत होते.
मराठवाड्यात पावसाचा खंड व लहरीपणा पाहता पिकांची अवस्था बिकट होऊन बसली आहे. शिवाय भर पावसाळ्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत बैठकीस मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे, ऑनलाइन पद्धतीने अनिल पाटील, गिरीश महाजन, संजय बनसोडे, तानाजी सावंत हे सहभागी झाले होते. तसेच विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, विविध जिल्ह्यांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित केली होती.
https://fb.watch/mxClTbFMVr/?mibextid=2JQ9oc
. मुंडे म्हणाले, की जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही पुढे गंभीर होण्याची शक्यता आहे. जनावरांना आवश्यक न्यूट्रिशन युक्त चारा मिळावा यासाठी कडोळ, मका अशी चारा पिके घेण्याच्या कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादमध्ये एक कॅबिनेटची बैठक घेण्यात यावी, अशी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे विनंती केलेली आहे. यातून मराठवाड्याच्या विकासाशी संबंधित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा मुंडे यांनी व्यक्त केली.
पीकविमा अग्रिम देण्यासाठी २१ दिवसांचा पावसाचा खंड हा निकष मानला जातो. परंतु यामध्ये तांत्रिक दुरुस्ती करण्यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासंदर्भात मदत व पुनर्वसनमंत्री संजय बनसोडे यांच्याशी ‘व्हीसी’द्वारे बोललो असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले
औरंगाबाद : प्रेमप्रकरणातून मुलाची निर्घृण हत्या, बेदम मारहाण करून फेकले पाण्यात