आरोग्य विभागात १६ हजार पदे तातडीने भरली जाणार; राजेश टोपेंची माहिती

- क्राईम टाईम्स टीम
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूने (Coronavirus) अक्षरशः कहर केला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा मात्र अपुरी पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागात १६ हजार पदांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार अशी एकूण चार हजार पदे भरली जाणार आहेत. तसेच क आणि ड वर्गातील १२ हजार कर्मचार्यांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले आहे.
या भरतीच्या प्रक्रियेचा निर्णय कॅबिनेटमध्ये होत असतो. पण यावेळी भरतीचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून भरतीचे आदेश लवकरच निघतील अशी माहिती आहे. आधी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता ५० टक्के भरती करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. येणाऱ्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण येईल. पण कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने ही संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी, अशी मागणी आरोग्य विभागाने केली होती.