“आधार” ची व्यवस्थाच झाली “निराधार”
सायेब आम्ही आधार अपडेट कुठी करावं?… सामान्य जनतेच्या सवाल
- क्राईम टाईम्स टीम
- दीपक सिरसाठ
अंधारी : आम आदमी का अधिकार म्हणजे “आधार” अशी ज्याची व्याख्या आहे त्या आधार कार्ड मध्ये अपडेट साठी नागरिकांना प्रचंड हेलपाटे घेण्याची वेळ आलेली आहे.
विविध शासकीय बाबींसाठी आधार कार्ड हा नागरिकांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. एवढेच नाही तर बहुतांश शासकीय योजनांसाठी, बँक खात्यांसाठी, अनेक कार्यांसाठी आधारला मोबाईल नंबर लिंक करून पूर्ण जन्मतारीख आणि संपूर्ण पत्यासह अपडेट करणे अनिवार्य झालेले आहे.
परंतु सध्या अंधारीसह सिल्लोड तालुक्यात एखादा अपवाद वगळता आधार नोंदणी केंद्रे आणि दुरुस्ती केंद्र नामशेष झालेली आहेत. त्यामुळे नागरिकांचा प्रचंड पैसा श्रम वेळ वाया जात असून सर्वसामान्यांना मानसिक शारीरिक व आर्थिक त्रास सोसावा लागत आहे. सध्या सिल्लोड तालुक्यात फक्त बोरगाव एक तर कन्नड तालुक्यातील नाचनवेल एकच आधार केंद्र सुरू असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तेथेही प्रचंड गर्दी असल्याने नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. शासनाने तात्काळ आधार नोंदणी आणि दुरुस्ती केंद्रे सुरू करावीत तसेच पोस्ट ऑफिस मधील आधार दुरुस्ती सुद्धा सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून मोठ्या संख्येने होत आहे.
*शासन म्हणते पोस्ट, पण माहीत नाही गोष्ट*
अंधारी परिसरात आधार दुरुस्ती केंद्र उपलब्ध नसल्या संदर्भात अनेक वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी आमचे प्रतिनिधी दीपक सिरसाठ यांनी चर्चा केली असता आधार अपडेट साठी पोस्ट ऑफिसचा पर्याय उपलब्ध असल्याची त्यांनी माहिती दिली परंतु पोस्ट मध्ये आधार अपडेट होतो ही गोष्ट अनेक सर्वसामान्य जनतेला माहितीच नाही. व त्यासाठी पोस्टाकडून सुद्धा कोणतीच जनजागृती केली जात नाही. दुसरीकडे अंधारी पोस्ट ऑफिस मधली आधार मशीन चे रजिस्ट्रेशन आहे की नाही हेच कोणाला माहीत नाही हाच प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे त्यामुळे शासन म्हणते आधार साठी आहे पोस्ट, पण माहित नाही पूर्ण गोष्ट असे म्हणण्याची वेळ आली आहे.
प्रतिक्रिया:-अंधारी परिसरात आधारची व्यवस्थाच निराधार झाली असल्याने सामान्य नागरिक आधार अपडेट पासून वंचित राहत आहेत. शासनाने तातडीने आधार दुरुस्ती केंद्र सुरू करावेत.
शिवाजी तायडे अंधारी
कडुबा सिरसाट (शेतकरी अंधारी )
माझे आधारकार्ड गेल्या वर्ष दीड वर्षापासून ब्लॉक झालेले असून ती दुरुस्त करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील बोरगाव तसेच कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील अनेकवेळा मी गेलो परंतु ती दुरुस्त झालेले नाहीत.आज होईल उद्या होईल या आशेवर आतापर्यंत दीड वर्ष उलटून गेला आहे शिवाय तालुक्याच्या ठिकाणी जाऊनही माझे आधार कार्डची चालू झालेले नसल्यामुळे मी अल्पभूधारक असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची पीएम योजना सुरू असून मला दीड वर्षांपासून माझे आधार कार्ड ब्लॉक झाल्यामुळे या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत यास कोणास जबाबदार धरावे हे मात्र कळेना